Friday, May 25, 2018

वाचलेल्या अन्नाने भागवली 35 हजार भुकेल्यांची भूक


लग्नसोहळ्यांतील जेवणावळीत भरपेट जेवण करून ढेकर देत प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाते; मात्र दुसरीकडे अनेकांना जेवण मिळत नाही. हेच भुकेले चेहरे पाहून अस्वस्थ झालेल्या संवेदनशील व्यक्तींनी शहरात "अन्न वाचवा समिती' स्थापन करीत "मिशन फॉर हंगर फ्री सिटी'ने हा उपक्रम राबविला. त्याचेच फलित म्हणजे यंदाच्या लग्नसराईतील 42 मुहूर्तांमधून सुमारे 35 हजार लोकांना पुरेल इतके अन्न जमा करून गरजूंपर्यंत ते पोचविण्यात आले.
दिवाळीपासून जुलैअखेरपर्यंत यंदा 54 लग्नमुहूर्त आहेत. त्यात जूनमध्ये पाच; तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत. "अन्न वाचवा समिती'चे अनंत मोताळे यांनी सांगितले, की दिवाळीपासून आतापर्यंत 42 लग्नमुहूर्त होते. या काळात शहरातील सर्व मंगल कार्यालयचालकांशी यापूर्वीच अन्न वाचविण्याच्या मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मंगलकार्यालयांकडून साधारणत: एका मुहूर्तावर पात ते सहा हजार लोकांना पुरेल इतके शिल्लक राहिलेले अन्न मिळाले. याशिवाय हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या भंडाऱ्यातून आठ हजार लोकांना पुरेल इतकी बुंदी मिळाली होती. जमा झालेले सर्व अन्न रेल्वेस्टेशन, बसस्थानके, उड्डाणपुलांचा परिसर, मंदिरांबाहेर बसणारे भिक्षेकरी, रात्रनिवारागृहांमध्ये राहणारे निराधार, रस्त्यांच्या कडेने पाल ठोकून राहणाऱ्या गरजूंना वाटण्यात आले. यासाठी मोताळे, ऍड. श्रीचंद जिग्यासी, चंद्रकांत वाजपेयी, राजेंद्र वाहुळे, रूपाली वाहुळे, स्वाती कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment